स्वतःच्या गावचा रस्ताही करता आला नाही त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये : आ. संभाजी पाटील निलंगेकर
निलंगा/प्रतिनिधी : काँग्रेसने फक्त जाती-पातींचे राजकारण केले. विकास काय असतो हे त्यांना ठावूकही नाही. ज्यांना स्वतःच्या गावाचा रस्ताही करता आला नाही त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत, असे प्रतिपादन लातूर लोकसभा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
लातूर लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ निलंगा विधासभा मतदार संघातील येरोळा व साकोळ या गावांमध्ये आयोजित कॉर्नर बैठकांमध्ये आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचीही त्यांच्यासमवेत उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, साकोळवासियांच्या आदेशाचे आजपर्यंत पालन आम्ही केले आहे. या भागातील नागरिकांनीही आमच्यावर तेवढेच प्रेम केलेले आहे. येथील सर्वसामान्य नागरिक कायमच भाजपाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून काँग्रेसच्या बॅनरवरील चाकूरकर साहेबांच्या फोटोचा आकार वाढू लागला आहे. यातूनच त्या पक्षाने कोणाला काय दिले किंवा कोणाचा विकास केला हे दिसून येते. आता केवळ निवडणुकीत त्यांना चाकूरकर साहेबांची गरज भासत असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत नरेंद्र मोदींना तिसर्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.
तत्पूर्वी खा. शृंगारे, आ. निलंगेकर व मान्यवरांनी साकोळ येथील बुद्ध विहार येथे दर्शन घेतले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नमन केले. महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते नतमस्तक झाले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, राष्ट्रवादीचे पंडित धुमाळ, जिल्हा सरचिटणीस भारत चामे, अॅड. संभाजी पाटील, जयश्रीताई पाटील, माजी सभापती संजय दोरवे, गोविंद चिलकुरे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, सुधीर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.