RelatedPosts
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाचा सन्मान वाढविला – कृषीमंत्री धनंजय मुंडे
अहमदपूर येथील सभेने महायुतीच्या प्रचाराची सांगता
अहमदपूर/प्रतिनिधी ः मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंबीर भूमिका घेवून देशाच्या विकासाला गती मिळवून दिली. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकवर आणली. मोदी यांच्या निर्णयामुळे देशाची शान व मान जगात उंचावली असून यातून प्रत्येक भारतीयाचा सन्मान वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केेले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, कवाडे गट, मनसे, रासप, महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर येथे आयोजित सांगता सभेत कृषीमंत्री मुंडे बोलत होते.
व्यासपीठावर उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी आमदार गोविंद केंद्रे, बब्रुवान खंदाडे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, शिवानंद हैबतपुरे, राष्ट्रवादीचे शिवानंद हेंगणे, भारत चामे, अशोक केंद्रे, सौ. अयोध्याताई केंद्रे, सौ. अश्विनीताई कासनाळे, शिवाजीराव देशमुख, अमित रेड्डी, त्र्यंबक गुट्टे, प्रताप पाटील, सिद्धार्थ सूर्यवंशी, जयश्रीताई केंद्रे, निखिल कासनाळे, गोविंद गिरी, दत्तात्रय जमालपुरे, चंद्रशेखर डांगे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना ना. मुंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विकासाची सर्वोच्च गती गाठलेली आहे. आगामी काळात हा देश कोणाच्या हातात द्यायचा हे ठरविणारी ही निवडणूक आहे. मोदींनी आपल्या कार्यशैलीने जगात देशाची पत वाढविण्याचे काम केले. संरक्षण व परराष्ट्र विषयात त्यांची धोरणे यासाठी कारणीभूत ठरली. यामुळेच जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढला असल्याचे मुंडे म्हणाले.
विरोधकांचा समाचार घेताना मुंडे यांनी सांगितले की, विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही. केवळ मोदी विरोध हाच अजेंडा घेवून अपप्रचार करत आहेत. पंतप्रधान मोदी फलंदाजी करताना त्यांना बाद करण्यासाठी दोघेजण एकाच वेळी गोलंदाजी करीत असून 33 क्षेत्ररक्षक मैदानात उभे असल्याचा मजेदार किस्साही त्यांनी ऐकवला. पंतप्रधान मोदी यांनी सामान्य नागरिकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरविले. शेतकर्यांना पीकविमा, महिलांसाठी उज्वला गॅस, सामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना देताना त्यांनी कधीही जात पाहिली नाही. सबका साथ सबका विकास असे म्हणणारे मोदी जाती-पातीचे राजकारण करीत नाहीत. सामान्य नागरिकांची पत वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे.
मुंडे म्हणाले की, विरोधक संविधान बदलाची अफवा पसरवित आहेत. परंतु, चंद्र-सूर्य आकाशात असेपर्यंत संविधान बदलणे शक्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच संविधानात तशी तरतूद केलेली आहे. मुंडे यांनी सांगितले की, जाती-पातीच्या पलीकडे जावून देशाभिमान जागृत करणारी ही निवडणूक आहे. आपल्याकडे देशाभिमान असेल तर मोदींनाच मतदान करा. लातूर मतदारसंघाचा विकास शाश्वत पध्दतीने करून घ्यायचा असेल, लातूरचा अभिमान आणि स्वाभिमान टिकवून ठेवायचा असेल तर खा. सुधाकर शृंगारे यांना विजयी करून मोदींच्या साथीला संसदेत पाठवा असे, आवाहनही मुंडे यांनी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना उमेदवार खा. शृंगारे म्हणाले की, लातूर मतदारसंघ आता विकासाच्या मार्गावर सुसाट धावत आहे. ही गती भविष्यात आणखी वाढणार आहे. त्यासाठी आपले मतदानरूपी आशीर्वाद आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. धनंजय मुंडे यांच्या सभेने प्रचाराची सांगता झाली. या सभेस अहमदपूर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.