सुषमा अक्कांनी राखली काँग्रेसची प्रतिष्ठा… देशमुख यांना कोणी ऐकेचना…
लातूर : मोठा गाजावाजा करून मैदानात उतरवलेले काँग्रेसचे डॉ.शिवाजी काळगे यांची सभा काँग्रेसनं प्रतिष्ठेची केलेली. पण याच सभेनं लातुरात काँग्रेसची प्रतिष्ठाही घालवली. बरं तर बरं, सुषमा अंधारेही या सभेला होत्या म्हणून पक्षाची किमान लाज तरी वाचली, अन्यथा बोलणारे देशमुख आणि रिकाम्या खुर्च्या असं चित्र लातूरकरांना दिसलं असतं.
टाऊन हॉल हे तसं सभेसाठी अगदीच सोप्पं ठिकाण. शहराच्या मध्यवर्ती भागी आणि रस्त्यालगत असणाऱ्या या मैदानात जेमतेम पाच हजार लोक बसतात. त्यात खुर्च्या असतील तर हा आकडा तीन ते साडेतीन हजारात संपून जातो. शिवाय रस्त्यावरून जाणारे हवशे, नवशे, गवशे सभेत डोकावून जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांना “रोजगार” द्यायची पाळी पक्षावर येत नाही. म्हणूनच काँग्रेस याच ठिकाणची निवड करत असावी.
याच मैदानात आताही काँग्रेसची नाचक्की होता होता राहिली. लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी झालेल्या या सभेला “प्रचंड” गर्दी व्हावी असं नियोजन कारण्यात आल होतं. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं रिकाम्या खुर्च्यांनी दाखवून दिलं. व्यासपीठा समोरच्या सभा मंडपात अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. व्यासपीठ मात्र खचाखच भरलेलं होतं. या व्यासपीठावर लातूर काँग्रेसचे कर्ते करविते आणि राज्य ज्यांच्याकडे “उद्याचा चेहरा” म्हणून पाहतय, असे युवा नेते अमित देशमुखही बसलेले होते. त्यांच्या जोडीला मूळ लातूरच्याच पण महाराष्ट्राची वाघीण म्हणून अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या सुषमा अंधारे याही होत्या.
अंधारेंचं नाव वक्ता म्हणून घोषित होतानाच सभामंडप गर्दीने भरून गेला. अंधारेंनी आपल्या रांगड्या भाषेत “नकलांचा कार्यक्रम” सादर केला. उपस्थित कार्यकर्ते पोट धरून हसले. भाषण संपून सुषमाअक्का गाडीत बसून जायच्या तयारीत असेपर्यंत कार्यकर्त्यांनीही सभेचा मंडप सोडून दिला.
लातूरचे आ. अमित देशमुख भाषणाला उठेस्तोवर अर्ध्याहून अधिक कार्यकर्ते मुख्य रस्त्याने मार्गस्थ झालेले होते. त्यानंतर काय? रिकाम्या खुर्च्या आणि आ. अमित देशमुख यांचा “संवाद” असा भन्नाट कार्यक्रम पार पडला. उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम आणि दरम्यान चारही उपदिशांना फिरत हातवारे करणारे माजी “नामदारां”चे भाषण पार पडले. पण त्या भाषणातून ना कार्यकर्त्यांना काही मिळाले ना पदाधिकाऱ्यांना! इकडे माजी नामदारांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे सभा स्थानावरून बाहेर पडत होते.
स्वतःच्या हिमतीवर काळगे यांना उमेदवारी मिळवून देत निवडून आणण्याची बात करणाऱ्या “देशमुख पार्टी”ला नमनालाच झालेला हा अपशकुन. हे पाहून उमेदवार काळगे यांचा चेहरा मात्र पाहण्या सारखा झाला होता.
सुषमा अक्कांनी मात्र काँग्रेसची लाज राखल्याची चर्चा गावाकडं व्हाया ढाबा परतणारे कार्यकर्ते करत होते. तीन दिवसानंतरही ही चर्चा अजून सुरूच आहे. राज्यात भाषणं ठोकणाऱ्या सुषमा अंधारे यांना जवळून ऐकण्याची संधी लातूरकरांना मिळाली एवढाच काय तो या सभेचा प्लस पॉइंट ठरला.