विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण व ‘विलासभवन’ कारखाना प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास कार्यक्रमाचे आयोजन
लातूर प्रतिनिधी : पश्चीम महाराष्ट्रा प्रमाणे मराठवाड्यातही साखर कारखानदारी यशस्वी ठरते नव्हे तर ती राज्य आणि देशासाठीही आदर्श बनू शकते हे सिध्द करून या मागास विभागात आर्थिक क्रांती घडविणारे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झालेल्या विलास साखर कारखान्यावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि विलास भवन या कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीची शिलान्यास १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१० वाजता होत आहे.
लातूर जिल्हयात सहकार आणि साखर उदयोगाची उभारणी करणारे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कारखान्याच्या ‘विलासभवन’ या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी क्षण असेल. हा कार्यक्रम आपल्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि विलास भवन प्रशासकीय इमारत शिलान्यासाच्या निमित्ताने आयोजित समारंभ सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन कारखाना संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात मात्र सहकार चळवळीला उशिरा चालना मिळाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १३ महिन्यांनी निजाम राजवटीतून मुक्ती मिळालेला मराठवाडा नंतर महाराष्ट्रात सहभागी झाला खरा परंतु इंग्रजी राजवटीपेक्षा मागास राहिलेल्या निजाम राजवटीत अनेक वर्ष पिचत पडलेल्या मराठवाड्यात प्रगतीचा विचार यायलाही बराच वेळ लागला. त्यामुळे या विभागात सहकाराची सुरुवातही उशिरानेच झाली. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर परिसर निजामाची राजधानी असलेल्या हैदराबादच्या जवळचा असल्यामुळे प्रारंभीपासूनच येथे थोडेफार शैक्षणिक वातावरण होते. शिक्षणातून प्रगल्भता आणि मग त्यातून स्वातंत्र्य आणि प्रगती होणे स्वाभाविक होते. परिणामी या भागात कर्तृत्ववान नेतृत्वाचीही निर्मिती झाली. त्यातून येथील उद्योग, व्यापार वाढत गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनीही येथे सूतगिरणी उभारल्याची नोंद आहे. प्रत्येक टप्प्यावर नेतृत्व उभे राहिल्याने कधी काळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या लातूरला जिल्ह्याचा दर्जा मिळाला आणि मग पुढे सर्वांगाने या भागाचा विकास होत गेला. माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रालाही आदर्श घ्यायला लावणाऱ्या सहकारी संस्था लातूर जिल्ह्यात उभ्या राहिल्याचे चित्र आज आपणाला पाहायला मिळत आहे. असे चित्र उभा करणारे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांचे विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी ता. जि. लातूर येथे उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळाचे अनावरण आणि ‘विलासभवन’ कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास करण्यासाठी विलासराव देशमुख स्मृति सोहळा रवीवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१० वा. आयोजित करण्यात आला आहे.
विलासराव देशमुख स्मृती सोहळा कार्यक्रमाच्या चेअरमन वैशाली देशमुख निमंत्रक असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री, दिलीपराव देशमुख आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आ. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कारखान्याच्या ‘विलासभवन’ या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास कार्यक्रम होणार आहे.