पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ द्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
महायुतीच्या जनआशीर्वाद सभेला लोटला जनसागर
लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील दहा वर्षात देशाची विकासाच्या महामार्गावर वेगवान घौडदौड सुरू आहे. आगामी काळात भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प मोदी यांनी केलेला असून आजवरची मोदी यांची कारकीर्द पाहता देशातील नागरिकांनाही मोदी यांची गॅरंटी आहे. याच गॅरंटीला लातूर मतदारसंघातील जनतेने साथ द्यावी, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजपा महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनआशीर्वाद सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. मंचावर राज्याचे मंत्री संजय बनसोडे, लोकसभा संयोजक तथा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेशअप्पा कराड, लोकसभा प्रभारी तथा प्रदेश सचिव किरण पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, माजी आ. गोविंद केंद्रे, सुधाकर भालेराव, बब्रुवान खंदाडे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अॅड. बळवंत जाधव, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, लातूर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, प्रेरणा होनराव, युवा मोर्चाचे अजित पाटील कव्हेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ माने, राष्ट्रवादीचे अॅड. व्यंकट बेद्रे, पंडित धुमाळ, प्रशांत पाटील, प्रविण पाटील चिखलीकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, शहर जिल्हाध्यक्षा रागिनी यादव, शिवसेनेच्या कल्पना बावगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, रिपाइंचे देविदास सोनकांबळे यांच्यासह महायुतीतील नेते व पदाधिकार्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
जनआशीर्वाद सभेला मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एका निष्कलंक नेतृत्वाचा अर्ज भरण्यासाठी मी येथे आलो आहे. खा. श्रृंगारे बोलतात कमी पण काम जास्त करतात. त्यांनी लोकसभेत 513 प्रश्न उपस्थित केले तर 68 चर्चांमध्ये सहभाग नोंदविला. श्रृंगारे यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघातील 3 लाख 5 हजार 977 शेतकर्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेचा निधी वर्ग झाला. 16 लाख 57 हजार 877 व्यक्तींना मोफत अन्नधान्य पुरविण्यात आले. सव्वा चार लाख नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करण्यात आले. अशा कितीतरी योजना सांगता येतील.
बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने अनेक वर्षांपूर्वी गरीबी हटावचा नारा दिला होता. परंतु गरीबांना अधिक गरीब करण्याचे काम त्यांनी केले. काँग्रेसच्या काळात देशात 36 मोठे घोटाळे झाले. मोदींच्या कार्यकाळात एकही घोटाळा झालेला नाही. आपले एक मत कमळाला दिले तर काय बदल होवू शकतो हे मोदी यांनी मागील दहा वर्षात दाखवून दिले आहे. एका मतामुळे देशातील नागरिकांना मोफत अन्नधान्याची गॅरंटी मिळाली. आयुष्यमान भारत योजनेत मोफत उपचार करून घेण्याची सोय मिळाली. आज तरुणही भाजपालाच मतदान करीत आहेत. जगातील एकाही देशाला जमले नाही परंतु, मोदींच्या नेतृत्वात भारताचा तिरंगा आज चंद्रावरही फडकत असल्याचा अभिमान प्रत्येक देशवासियांना असल्याचे त्यांनी सांगितले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान काश्मिरमध्येही लागू व्हावे, असे काँग्रेसला कधीच वाटले नाही. पण मोदी यांनी 370 कलमाची किड हटवली. आज देशमुख पार्टी संविधान बदलत असल्याचा अपप्रचार करत आहे. पण संविधानाचा धर्मग्रंथ हातात घेवून संसदेच्या पायरीला नतमस्तक होत मोदी यांनी संसदेत प्रवेश केला आहे. याउलट काँग्रेसने संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा निवडणुकांमध्ये पराभूत करण्याचे पाप केले. काँग्रेसचे नेते खोटे बोलत आहेत. संविधान अधिक मजबूत करण्याचे काम मोदी यांच्याकडून केले जात आहे. भाजपाने आपल्या संकल्प पत्राची घोषणाही डॉ. आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर केली आहे. ज्या काँग्रेसने प्रभू श्रीरामचंद्रांना काल्पनिक म्हटले होते त्या रामचंद्रांचा 527 वर्षांचा वनवास मोदी यांच्या नेतृत्वामुळे संपुष्टात आला. तंबूत असणारे रामचंद्र भव्य मंदीरात विराजमान झाल्याचे ते म्हणाले.
या निवडणुकीत आपण जे मत देणार आहोत ते मत समान नागरी कायद्याला पाठिंबा दर्शविणारे असेल. नागरिकांना मोफत अन्न देणारे, तीन कोटी नागरिकांना घर देणारे हे मत असणार आहे. हीच मोदी यांची विकसित भारताची गॅरंटी असल्याचे बावनकुळे म्हणाले.
यावेळी बोलताना मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, देशाला विकासाच्या महामार्गावर पुढे नेण्यासाठीच अजितदादा पवार यांनी मोदी यांना पाठींबा दर्शविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान व लोकशाही वाचविण्याचे काम करीत आहेत. विरोधक केवळ भूलथापा मारत असल्याचे सांगून डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसला इतका कालावधी का लागला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिलची जागा स्मारकासाठी मिळवून दिली. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहात असल्याचे ते म्हणाले.
सभेस संबोधित करताना आ. संभाजी पाटील म्हणाले की, 2017 -18 मध्ये जिल्ह्यातील जनतेने ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व सत्ता भाजपाकडे सोपवली. त्यानंतर आपण पक्ष नेतृत्वाकडे लातूरसाठी रेल्वे बोगी कोच कारखान्याची मागणी केली. वरिष्ठ नेत्यांनी ती मागणी तात्काळ मंजूर केली. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या कारखान्याचे लोकापर्णही झाले आहे. जिल्ह्यातील जनतेवर आपला विश्वास आहे. या निवडणुकीत लातूरची जागा मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार असल्याची आपल्याला खात्री आहे. मात्र लातूरकरांच्या दोन मागण्या पूर्ण कराव्यात, असे सांगत 60 वर्षात लातूरचा पाणीप्रश्न सुटला नाही त्यामुळे लातूरकरांना हक्काचे पाणी द्या, तसेच शैक्षणिक राजधानी असणार्या लातुरसाठी केंद्रीय विद्यापीठ मंजूर करा अशी मागणी आ. निलंगेकर यांनी केली.
खा. सुधाकर श्रृंगारे यावेळी म्हणाले की, मागील निवडणुकीत आपण मला लातूरचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. या काळात मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काम केले आहे. आपण दिलेले मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणार आहे. आपला देश सुरक्षित हातात सोपवायचा असून त्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना संपर्कप्रमुख बळवंत जाधव म्हणाले की, काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळेच लातूरचे प्रश्न सुटले नाहीत. खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या माध्यमातून आता शहरासह संपूर्ण मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक होत असून ही कामे गतिमान करण्यासाठी श्रृंगारे यांना पुन्हा निवडून देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आ. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, रिपाइंचे देविदास सोनकांबळे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व नेत्यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
या सभेचे सुत्रसंचलन शैलेश गोजमगुंडे तर आभार प्रदर्शन गुरुनाथ मगे यांनी केले.
या सभेस ऋषिकेश कराड, युवा मोर्चाचे गणेश गोमचाळे, शिरिष कुलकर्णी, दिग्वीजय काथवटे, प्रविण सावंत, बाबू खंदाडे, रामचंद्र तिरुके, रमेश सोनवणे, गंगासिंह कदम, रवि सुडे, रविशंकर केंद्रे, संगीत रंदाळे, शैलेश स्वामी, सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, शामसुंदर मानधना, भागवत सोट आदींसह मतदारसंघातून आलेल्या महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राष्ट्रीय भावना हा लातूरच्या मातीचा गुण ः बसवराज पाटील मुरुमकर
लातूर मतदारसंघातील नागरिकांनी सर्वधर्म समभाव जोपासलेला आहे. येथे जातीपातीला थारा नाही. राष्ट्रीय भावना हा लातूरच्या मातीचा गुण आहे. परंतु काही लोक वेगळ्या विचाराने अपप्रचार करीत आहेत. ते लोकशाही आणि लातुरकर नागरिकांसाठी घातक आहे. त्यामुळे नागरिकांनी राष्ट्रीय भावना जोपासत देश हितासाठी महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांना विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी केले.
मी तुमचा योग्य वकील ः बावनकुळे
आ. संभाजी पाटील यांनी आपल्या भाषणात लातूरसाठी कायमस्वरुपी पाणी योजना व केंद्रीय विद्यापीठाची मागणी केली. हा धागा पकडत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संभाजीराव मी तुमचा योग्य वकील आहे. केंद्र आणि राज्यातही आपले सरकार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून मला असणार्या अधिकारांचा वापर करत मी उद्याच प्रधानमंत्री मोदी यांना पत्र लिहीत या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करेन, अशी ग्वाही दिली. विशेष म्हणजे प्रधानमंत्री मोदी लवकरच लातूरला येणार आहेत. लातूरच्या विकासाची लक्ष्मी खा. श्रृंगारे यांच्या कमळावर बसून येणार असल्याचेही बावनकुळे यावेळी म्हणाले.