लातूर : जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून केले जाते. अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारित शिक्षणातून तेजस्वी तरूण घडविण्याचे काम केले जाते. तसेच यापुढील कालावधीतही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज, बदलता काळ, संस्थेचा उद्देश व वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन शैक्षणिक प्रगती साध्यण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे, असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निकच्यावतीने आयोजित पालक मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अभय वावरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य दयानंद हासबे, प्रथम वर्ष विभाग प्रमुख महेश आदमिले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य अभय वावरे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवादाचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पालकांपैकी काही मोजक्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार साहेल शेख यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.