लातूर, दि. २४ – विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजुला सारून आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव देत स्वत:ची कर्तृत्त्ववान ओळख निर्माण करावी, असे आवाहन तुळजाभवानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे यांनी केले. येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील राजमाता जिजामाता विद्यालय, तुळजाभवानी विद्यालय व संगमेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचा गरबा व दांडिया रास कार्यक्रम पार पडला, यावेळी मुख्याध्यापिका केंद्रे बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन संकुलाच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये व सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, समन्वयक वैशाली केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजेंद्र जायेभाये, समन्वयक राजीव मुंढे, प्रा. अश्विनी केंद्रे, उपप्राचार्या कविता केंद्रे, आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनिया जायेभाये, मंजुषा गलांडे, विजया होनराव, निशा, कुलकर्णी, मीरा चाटे, धारूबाई सूर्यवंशी, कल्पना नवगिरे, शाहू उटगे, सुधाकर लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापिका केंद्रे म्हणाल्या, अभ्यास तर महत्त्वाचा आहेच परंतु, आपल्या मनावरील ताण कमी व्हावा यासाठी विविध खेळ खेळण्याची गरज आहे. दरवर्षी आपल्या संकुलात गरबा व दांडिया कार्यक्रम आयोजित केला जातो. हा खेळ गुजरातमधून आपल्याकडे आला आहे. या निमित्त वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यात येते. विद्यार्थ्यांनीही आपल्यातील वाईट सवयींचे दहन करून चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी दांडिया रास कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. सूत्रसंचालन ए. बी. मुंडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका सुनीता जवळे यांनी मानले. यावेळी संकुलातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.