राग रंग नेत्यांचा : पुर्वरंग प्रचाराचा
लोकसभा निवडणूक प्रचाराची पहिल फेरी पुर्ण होत असताना काँगेस व भाजपाचा एकंदरीत प्रचार कसा सुरु आहे याचा आढावा
अरुण जि. हांड(8788392896)
लातूर लोकसभा 2024 : उन्हाचा कडाका अन् प्रचाराचा धुराळा
लातूर : लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान होणार आहे. लातूर लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. 2019 ची लातूर लोकसभा निवडणूक तिरंगी झाली होती. यावेळी मात्र प्रमुख दोन पक्षात सरळ लढत होईल असा अंदाज आहे. महायुती, भाजपाने विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाच मैदानात उतरवले आहे तर महाविकास आघाडी, काँग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या डॉ. काळगे यांनी यापुर्वी मागील लोकसभे वेळी भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी तिकीट मागीतल्याचे सांगीतले जाते. मात्र त्यांना भाजपाने तिकीट नाकारले होते.
लातूर लोकसभा निवडणूक अनुषंगाने सर्वच पक्षांनी आप-आपले आराखडे आखण्याला सुरुवात केली आहे. भाजपाने लातूर लोकसभेचा उमेदवार अगोदर जाहीर करुन एक पाऊल पुढे टाकले होते तर काँग्रेसने उमेदवारी कोणाला मिळणार यात बराच सस्पेंस ठेवल्या नंतर डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीने राजकीय वर्तुळात बरीच साधक बाधक चर्चा झाली. काँग्रेसने लिंगायत समाजातील पोट जात असलेल्या आणि माला जंगम या जातीचे प्रमाणपत्र असलेल्या डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली. या डावाला प्रतिडाव टाकत भाजपाने काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा भाजपात प्रवेश करुन घेतला.
आ. अमित देशमुख यांनी स्वत: जातीने लक्ष घालत महाविकास आघाडी, काँग्रेसचे उमेदवार डॉ. काळगे यांच्या संपुर्ण प्रचाराची रणनिती आखली आहे. सर्व प्रमुख पदाधिकारी यांना जबाबदारी देत प्रत्येक विधानसभा निहाय प्रचार यंत्रनेत सक्रिय केले आहे. यामुळेच जरी भाजपाने आपला उमेदवार पहिल्यांदा जाहीर करुन एक पाऊल पुढे टाकले होते तरी सद्या प्रचार यंत्रणा सुरळीत करुन योग्य प्रकारे राबवीण्यात त्यांना यश आले नाही. प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी अजून ही खुप दिवस आहेत याच भ्रमात भाजपा वावरताना दिसत आहे.
एकंदरीत काँग्रेसची सुनियोजीत प्रचार यंत्रना कार्यान्वीत झाली असताना भाजपाला अजून तरी प्रचारात सुसुत्रता आणता आली नाही हे जाणवत आहे. भाजपाची सगळी मदार मोदी या नावावरच टिकलेली दिसत आहे. भाजपाचे उमेदवार यांनी देखील उदगीर येथे केलेल्या भाषणात मोदी हाच उमेदवार म्हणत मत देण्याचे मतदारांना आवाहन केले. काही महिण्यापुर्वी हेच खसदार आपण स्वत: पाच वर्षाच्या कार्यकाळात आता पर्यंतच्या खासदारांपेक्षा सरस काम केल्याचे जाहीर सांगत होते. मग आताच का त्यांना आपल्या कामाचा विसर पडला. कामावर मतदान मागण्या एवजी मोदीकडे बघा अन मतदान करा असे त्यांना म्हणावे लागत आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
आ. संभाजी पाटील / आ. अमित देशमुख यांचा प्रचाराचा राग-रंग निराळा
लातूर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या नंतर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी हि निवडणूक हातात घेतली आहे. याच निवडणूकीच्या निकालाचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणूकीवर पडणार आहे. आ. संभाजी पाटील यांनी लोकसभेचा प्रचार सुरु करण्यापुर्वीच थेट देशमुखांवर टिकेची राळ उठवत आपली प्रचाराची दिशा कशी असेल याची झलक दाखवली आहे. तर दुसरीकडे आ. अमित देशमुख यांनी मात्र लोकसभेचा प्रचार सुरु करताना टिकेचे राजकारण न करता लोकांमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या रोषाला व महागाई, बेरोजगारी, महिलांचे, शेतकऱ्याचे प्रश्न यासोबतच खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या व्यक्तीमत्वातील उणीवा व डॉ. शिवाजी काळगे यांच्या व्यक्तीमत्वातील जमेच्या बाजू यांना विशेष करुन ठळकपणे समोर ठेवण्याचे काम केले आहे.
आता लातूर लोकसभेत प्रचाराची खरी रंगत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतरच वाढणार असली तरी एकंदरीत प्रचार करताना कोण कोणती रणनिती आखत प्रचाराचा राग-रंग कसा असेल, प्रचार कोणत्या वळणावर जाणार याची झलक दिसली आहे.